Thursday, 1 March 2012

माणगाव व औरंगाबाद येथील चर्चांमधील ठळक मुद्दे


·         बदलत्‍या वातावरणात मुद्द्यांवरची लढाई आपण समग्र करु शकलो नाही. आज बाहेर लोकांसमोर विश्‍वासार्ह नेतृत्‍व नाही. पुरोगामी परंपरेतील कार्यकर्ते त्‍यांना विश्‍वासार्ह वाटतात. पण त्‍या मुद्द्यापुरताच त्‍यांचा संबंध राहतो. अन्य प्रश्‍नांसाठी लोक आजच्‍या प्रचलित राजकीय कार्यकर्त्‍यांकडे जातात. त्‍या अनेकविध प्रश्‍नांच्‍या, अडचणींच्‍या सोडवणुकीसाठी आपण लोकांना उपलब्‍ध नसतो. चळवळींत कप्‍पेबंदपणा आला आहे. त्‍यांत विखंडितपणा वाढतो आहे. एकसंधता दिसत नाही.
·         चळवळी थंडावलेल्‍या नाहीत. तथापि, त्‍या गुड गव्‍हर्नन्‍स मागतात. सत्‍ता बदलण्‍याची-ताब्‍यात घेण्‍याची दिशा घेत नाहीत. त्‍यांचे अ-राजकीयीकरण झाले आहे. ‘राजकारणाला’ मध्‍यवर्ती आणणे, हे आपले काम असले पाहिजे.
·         ‘कोणतीही विचारसरणी नको’ असे म्‍हणणे, ही भांडवली विचारसरणीच आहे. चळवळींना दिशाहिन करण्‍याचा तो डाव आहे.
·         देशाच्‍या विकासाचे मॉडेल काय असणार, यावर सहमती झाल्‍याशिवाय चळवळींची व्‍यापक एकजूट कठीण आहे. अधिकाधिक सहमतीच्‍या दिशेने जाण्‍यासाठी ‘विचारवेध’ संमेलने मदतनीस ठरु शकतात. त्‍यांचे पुनरुज्‍जीवन करावयास हवे.
·         वैचारिक एकवाक्‍यता तातडीने होणे कठीण असते. त्‍याबाबतची चर्चा चालू ठेवायला हवी. मात्र मुद्देनिहाय एकजुटी वाढवत न्‍ययायला हव्‍यात.    
·         निवडणुका तोंडावर असताना होणा-या पुरोगामी पक्षांच्‍या एकजुटीचा कार्यक्रम व जाहीरनामा ख-या अर्थाने सहमतीचा व सर्वांना स्‍वीकारार्ह असतोच असे नाही. म्‍हणूनच निवडणुकांचा तातडीने संदर्भ नसताना सहमतीच्‍या व्‍यापक कार्यक्रमावर एकजूट व आंदोलन व्‍हायला हवे.
·         एनजीओंमुळे पुरोगामी राजकारण कमजोर झाले अथवा त्‍यांनी चळवळींना गिळंकृत केले, असे नसून पुरोगामी चळवळींच्‍या अ-राजकारणामुळे एनजीओ फोफावल्‍या.
·         पक्षीय चौकटीतून बाहेर पडणा-या सर्वांनाच ‘एनजीओ’चा शिक्‍का मारणे बरोबर नाही. ‘सत्‍तासंबंधांना धक्‍का लावणे म्हणजे राजकारण’ असेल, तर पक्षीय चौकटीत नसलेल्‍या अनेक व्‍यक्‍ती जनसंघटनांच्‍या पातळीवर हे राजकारण करत आहेत.
·         जनसंघटनेच्‍या पातळीवरील असा सत्‍तासंबंधांना धक्‍का लावणारा लढा झाल्‍यानंतर या लढ्याला पुढचे टोक कसे आणायचे, प्रत्‍यक्ष निवडणुकांत काय भूमिका घ्‍यायची हा प्रश्‍न असतो.
·         राजकीय सत्‍ता ताब्‍यात घेण्‍यासाठी प्रभावी राजकीय व्‍यासपीठ उभे करणे आवश्‍यक आहे. (ताकाला जाऊन भांडे लपवू नये) केवळ प्रश्‍नांवर काम करणे प्रतिक्रियात्‍मक होते.   
·         परिवर्तनाचा वाहक कोण ? – संघटित कामगार, असंघटित कामगार की शेतीशी जोडलेले समुदाय ?
·         मध्‍यपूर्वेतील घडामोडी किंवा लॅटिन अमेरिकेतील बदल लक्षात घेतले तर आज जनकेंद्री डावे आंदोलन उभे राहण्‍याचा काळ आहे का, याचा विचार करावा करायला हवा. लाटा आदळणार आहेत. लोक पक्षाची वाट बघणार नाहीत. अशावेळी आंदोलन व पक्ष यांचा विचार एकत्रच करणे आवश्‍यक आहे का ? ....या प्रश्‍नावरील चर्चेत याप्रकारेही मत व्‍यक्‍त झालेः अभिजात अर्थाने कम्‍युनिस्‍ट पक्ष हे वैचारिक केंद्र असते, तो सत्‍ता हातात घेत नसतो, पक्षाकडून मिळालेल्‍या मार्गदर्शनाप्रमाणे जनआंदोलनात अन्‍य पुरोगामी शक्‍तींशी लोकशाही निर्णयप्रक्रियेने पक्षकार्यकर्ता सहकार्य करतो. त्‍यामुळे जनआंदोलन व पक्ष यांत द्वैत उभे राहण्‍याचा प्रश्‍नच येत नाही.
·         औद्योगिक भांडवलशाहीचा अंत होऊन आता वित्‍तीय भांडवलशाहीचा काळ सुरु झाला आहे. आजच्‍या प्रश्‍नांना एकास एक असे उत्तर नाही. गुंतागुंत वाढली आहे. प्रचलित पुरोगामी विचारसरणींचा विकास आवश्‍यक आहे.
·         आज संगणक क्रांती सर्वव्‍यापी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज या क्षेत्रात पुढे येतो आहे. संगणकाला एकेकाळी झालेला विरोध अनाठायी होता. भांडवलशाहीतूनच पुढची अवस्‍था येणार आहे. अशावेळी भांडवलशाहीने जन्‍माला घातलेल्‍या तंत्रसाधनांचा वापर नाकारणे अयोग्‍य आहे. ....या मतांच्‍या बरोबर विरोधी मतही व्‍यक्‍त झाले. संगणकाला विरोध हा त्‍यामुळे येणा-या बेकारीला विरोध होता. तो बरोबरच होता. आज ओबीसी समाज या क्षेत्रात दिसत असला तरी सूत्रे कोणाच्‍या हातात आहेत, हे पाहणे आवश्‍यक आहे. तंत्रज्ञान व जागतिकीकरण या दोन वेगळ्या गोष्‍टी आहेत. तंत्रज्ञानाला पाठिंबा असणारे जागतिकीकरणाच्‍या विरोधात असू शकतात. तंत्रज्ञानात झालेल्‍या प्रगतीने लोकांचे जीवनमान उंचावते, असे नव्‍हे.  
·         जुन्‍या काळात चळवळींना मिळणारा प्रतिसाद आणि आताचा क्षीण प्रतिसाद या स्थितीस आपली वैचारिक धारणा कारण आहे. वर्गाला जसे आपण महत्‍व दिले, तसे जातीप्रश्‍नाला दिले नाही. डाव्‍या नेतृत्‍वाच्या तात्त्विक, व्‍यावहारिक मर्यादा आजच्‍या स्थितीस कारण आहेत. कोणत्‍याही एकजुटीसाठी वैचारिक एकजूट सर्वाधिक महत्‍वाची असते.
·         आपल्‍या एकजुटीच्‍या आड फक्‍त वैचारिक मतभेदांपेक्षाही इतर अनेक बाबी कारण आहेत. एकाच प्रश्‍नावर काम करणा-या संघटनांची जूट न होण्‍यात नेतृत्‍वाचे वैयक्तिक अहंगंड आड येतात. वैचारिकतेपेक्षाही खरे म्‍हणजे या अन्‍य बाबीच अधिक परिणाम घडवतात.
·         काहीवेळा तात्‍पुरत्‍या लाभासाठीची सबगोलंकारी एकजूट ही भविष्‍याच्‍या दृष्‍टीने मारक ठरते. ‘रिडालोस’वर अनेकांनी यासंदर्भात मते व्‍यक्‍त केली. ती फसवी एकजूट होती, ही सर्वसाधारण प्रतिक्रिया होती.
·         लोकांकडे सत्‍ता जाणे, लोक सिद्ध होणे-प्रसंगी संघटना क्षीण झाली तरी चालेल-यास महत्‍व द्यायला हवे. याचा अर्थ, राज्‍य किंवा केंद्र या सत्‍तांना कमी लेखणे नव्‍हे. ‘मेंढालेखा’ने पुढे आणलेली ‘दिल्‍ली-मुंबईत आमचं सरकार, आमच्‍या गावात आम्‍हीच सरकार’ ही घोषणा पूर्णत्‍वाने लक्षात घेणे आवश्‍यक आहे.
·         विकासप्रक्रियेचा लाभ दलित, मुस्लिमांना होतो, पण गावातील निर्णयप्रक्रियेत त्‍यांचा सहभाग नसतो. त्‍यांची सिद्धता कशी करायची ?
·         जातीलाच जातीचे दुखणे कळते, ते इतरांना कळू शकत नाही, हा विचार योग्‍य आहे का ?
·         बचत गट तसेच ग्रामपंचायतीतील महिलांच्‍या प्रवेशाने जे नवे चैतन्‍य महिलांच्‍यात मोठ्या प्रमाणात दिसते आहे, त्‍याची योग्‍यप्रकारे नोंद आपल्‍याकडून घेतली जाते, असे वाटत नाही.
·         वैचारिक मतभेद तीव्रतेने मांडले जाण्‍यात गैर काही नाही. पण जराही वेगळे बोलणारा आमच्‍यातला नव्‍हे, अशी भूमिका घेतली जाते, हे बरोबर नाही. व्‍यापक आघाडीत वैचारिकतेचे टोक किती गाठायचे याला मर्यादा असावी लागते. भांडवलदार कितीही आपसात भांडले तरी परस्‍परांच्‍या धंद्याला खोट बसू देत नाहीत. त्‍यांचे हितसंबंध आपल्‍यापेक्षा कितीतरी जास्‍त असतात. तरीही ते हा समज दाखवतात. आपण तर ‘ओसाड’ गावचे राजे. आपण हा समज दाखवत नाही. ‘वैचारिक पाया’ ची चर्चा तासन् तास चालते. पण एकत्र कसे राहायचे, याची चर्चा, त्‍याचे यमनियम आपण ठरवत नाही. भांडवलदार लांब पल्‍ल्‍याची आखणी करतात. आपल्‍यालाही जे करायचे आहे, ते पुढच्‍या पिढीसाठी, हे आपण लक्षात घ्यायला हवे. 
·         आपण निवडणुका लढायला घाबरतो. घाण साफ करायची तर नाल्‍यात उतरावे लागते. नाल्‍यात उतरले की थोडी घाण आपल्‍या अंगावरही उडणार. त्‍यास आपण घाबरता कामा नये.
·         राज्‍यसंस्‍थेचे स्‍वरुप बदलते आहे. ९० नंतरच्‍या उत्‍तर औद्योगिक काळात संस्‍थीभवनाचे पॅटर्न बदलले आहेत. औद्योगिक भांडवलशाहीने राष्‍ट्रराज्‍य संकल्‍पना व गतिमानता दिली. आता सिटिझन ऐवजी नेटिझन व्‍हायला लागलो आहोत. तंत्रज्ञान नाकारणे हे अनैतिहासिक आहे. तथापि, वाढत्‍या कनेक्टिव्हिटीत मानवी प्राण कसे ओतणार हा प्रश्‍न असल्‍याचे ते म्‍हणाले. कामगार व किसान हे चळवळीचे आधार या पूर्वीच्‍या अर्थाने आता कालबाह्य झाले आहेत. नव्‍या मध्‍यमवर्गातले काही जण निराभास होत आहेत, हे लक्षात घेऊन त्‍यांच्‍याशीही संबंध जोडले पाहिजेत. नवी चिकित्‍सा उभी करणारे त्‍या त्‍या जातीत, समाजविभागांत उभे राहायला हवेत. तसे काही उभे राहतही आहेत. त्‍यांना आपण बाहेरुन साथ द्यायला हवी. ते एकटे पडता कामा नयेत. ...या मांडणीवर चर्चा करताना वित्‍त भांडवलाचं अस्तित्‍व औद्योगिक भांडवलावर असते, अशी थोडी सैद्धांतिक चिकित्‍साही झाली.
·         काही जुन्‍या समजुतींना नव्‍या संशोधनाने नकार दिलेला आहे, हे आपण लक्षात घ्‍यायला हवे. आर्य बाहेरुन आले, प्राचीन काळी आदिम समाज हा स्‍त्रीसत्‍ताक होता, या समजुतींचा फेरविचार करायला हवा. एकलव्‍याचा अंगठा मागणा-या द्रोणाचार्यांचा हेतू गैरच होता. तथापि, जगात कोणीही आदिवासी बाण सोडताना अंगठ्याचा वापरच करत नाहीत, अगदी ऑलिंपिकमध्‍येसुद्धा याची आपण नोंद घ्‍यायला हवी. आदिवासींचा धर्म हिंदू नाही, किंबहुना त्‍यांना धर्मच नाही, हे म्‍हणत राहिल्‍याने ते भाजपच्‍या दावणीकडे कसे सरकले याचा विचार करायला हवा.
·         पुढील उपाययोजनांसंबंधी तसेच आकृतिबंधाबाबत आलेल्‍या काही सूचना अशा आहेतः
o    नव्‍या कार्यकर्त्‍यांची तयारी करणारी शिबिरे.
o    आपापल्‍या कार्यक्षेत्रात, स्‍थानिक ठिकाणी अभ्‍यासमंडळे, व्‍याख्‍यानमाला, राज्‍यव्‍यापी/विभागवार परिवर्तनवादी विचारांचे सांस्‍कृतिक जलसे/साहित्‍य चर्चा यांचे आयोजन.
o    पुढच्‍या चर्चांमधून विविध समाजघटकांचे मानस तसेच राजकीयीकरण म्‍हणजे काय अशा मुद्द्यांची चर्चा व्‍हावी, कार्यकर्ता व अभ्यासक यांचा समावेश असलेले ‘विचारवेध संमेलन’ (जे सध्‍या थांबवण्‍यात आले आहे) नव्‍या स्‍वरुपात सुरु करावे.
o    ‘सांस्‍कृतिक क्षेत्रातील हस्‍तक्षेप’ याबाबचा आराखडा तयार करावा.
o    विविध विचारसरणींचा परिचय करुन देणारी शिबिरे.
o    महत्‍वाच्‍या विषयांवरचे लेख झेरॉक्‍स करुन आपल्‍यात वितरित करणे.
o    संपर्क-संवादाचे एक माध्‍यम म्‍हणून एक ब्‍लॉग तयार करावा तसेच आपल्‍या चळवळीचे साहित्‍य इंटरनेटवर सहजरित्‍या उपलब्ध होण्‍यासाठी युनिकोडचा वापर वाढवावा.

No comments:

Post a Comment